RSS
Hiii...!!!You will get to read movie reviews of recent releases as well as movies I keep watching time to time. Enjoy!!

रॉकस्टार..


The most awaited music drama of the year is finally released... "रॉकस्टार" हा म्युझिक ड्रामा तर झालाय पण ती एक प्रेमकथा आहे. आणि त्यात एका रॉकस्टारची कथा फार कमी आहे. एक कोणतीही जनरल लव्ह स्टोरी म्हणून खपून गेली असती (ज्यात हिरो पोटापाण्याचा उद्योग म्हणून गायक आहे.. ;-) ) फिल्मविषयी चांगली गोष्ट म्हणजे म्युझिक. गाणी पहिल्यांदा ऐकली तेव्हा अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटलेला. अस वाटत होतं की Rockstar music is lacking of rock पण फिल्म पाहताना फक्त म्युझिकच रॉकचा फील देतं. कारण मूळ कथेत फारसा दम नाही. एक चांगला विषय आणि इम्तियाज सारखा दिग्दर्शक असताना कथा खूप चांगल्या पद्धतीने मांडली जायला हवी होती. जे झालेलं नाहीये. मुळात नायकाचं संगीताविषयीचं प्रेम, रॉकस्टार बनण्याची इच्छा, त्याचं मध्यमवर्गीय असणं यातली कोणतीच गोष्ट ठळकपणे व्यक्त होत नाही. बर्र, पूर्वायुष्य जाऊ दे पण त्याचा नंतरचा पण संघर्ष नीट मांडला न गेल्यामुळे त्याचं अग्रेसिव्ह होणं पण पटत नाही. त्याचा आधीच्या आयुष्यातला इनोसन्स दाखवायला रणबीरला जमलं नाही. मतिमंद वाटतो. त्यामानाने नंतरचा अभिनय बराय..(कदाचित तो त्याच्या स्वभावाच्या जवळ जाणारा असावा.. ;-) ) त्याचं हीरविषयीचं प्रेम जसं व्यक्त झालय तसं त्याचं संगीताविषयी पण व्यक्त व्हायला हवं होतं. दोघांची केमिस्ट्री चांगली आहे पण कथेत त्यांच्या प्रेमाची खोलीदेखिल नीट आली नाहीये. नातं बांधलं जातानाचा आणि घट्ट होतानाचा काळ तो इंपॅक्ट सोडत नाही आपल्यावर. आता नर्गिस फाकरीविषयी, इम्तियाजला परदेशी नायिकांमध्ये काय इंटरेस्ट आहे हे एक कळत नाही.. ;-) त्याला काश्मिरी ब्युटीच वापरायची होती तर आपली (?) कॅट काय वाईट होती? आणि नाही म्हणायला बॉलीवूडमध्ये इतकी वर्षे काढल्यावर थोडा फार अभिनय करते ती. त्यामानाने नर्गिस म्हणजे काहीच नाही. दिसायला पण कॅटसारखी नाही, नाचताही येत नाही, अभिनयही नाही.. संवाद असायला हवे तितके फाडू नाहीत. पण चांगलं संगीत आणि तेही मुबलक वापरल्यामुळे चित्रपट बघू शकतो आपण शेवटपर्यंत. (पावणेतीन तास..) इर्शाद कामिलचं लिरीक्स पण भारी. भारी अशा अर्थी की एका सिनेमाचं संगीत म्हणून जे असतं त्यापेक्षा प्रयत्नपूर्वक ते वेगळं ठेवायला चांगलच जमलय त्यांना. बाकी, शम्मी कपूर ला बघून भरुन आलं मला तरी. कथानकाला वेग आहे. १४ गाणी असूनही जास्त वाटत नाहीत हे विशेष.
एकूणातच चित्रपट एकदा पाहू शकतो पण एका रॉकस्टारची कथा म्हणून नाही तर एक म्युझिकल लव्ह स्टोरी म्हणून. आणि म्हणायचंच झालं तर चित्रपटाचे खरे रॉकस्टार आहेत रेहमान आणि कामिल.. :-)

देऊळ


"ज्याला देव हवा आहे त्यानं तो आपापला शोधावा.. ज्याला नको आहे त्यानं शोधू नये, हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे" हे जितकं खरं आहे तितकंच हे ही खरं आहे की ज्याला कथा हवी असते, त्याला ती कुठेही मिळते, तो ती मांडतो.. ती पाहण्याचं किंवा न पाहण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.. पण लोकहो, हे स्वातंत्र्य घ्या आणि 'देऊळ' नक्की पहा. मध्यंतरापर्यंत फार्सिकल टोन असलेला सिनेमा, मध्यंतरानंतर बराच गंभीर होतो. सिनेमाचं नाव आणि टॅग लाइन वाचून काही आडाखे बांधले असतील तर ते बर्‍यापैकी खरे निघतात पण खरी गंमत कथेच्या मांडणीत आहे. सामाजिक विषयावर भाष्य करतानादेखिल चित्रपटाची एक निश्चित कथा आणि त्या कथेची मागणी पूर्ण करत असणारी कलाकृती ही कधीही सरस ठरते. खूप सार्‍या व्यक्तिरेखांसह एक मोठा कालपट पडद्यावर मांडताना त्याला इतक्या कमी वेळात न्याय देणं तुलनेने अवघड असतं पण ही गोष्ट खूप उत्तम पेलली गेलीये. दोन्ही भाग, मध्यंतरा पर्यंत आणि नंतर थोडे मोठे वाटले. १० मि. मे बी. पण सगळं मिळून चित्रपट मोठा वाटत नाही. चित्रपट पाहता पाहता, शेवटाकडे येताना, "हा, बरं मग? हे असं होतं माहितेय! मग म्हणायचं काय आहे" असा प्रश्न पडू शकेल नेमक्या अशाच वेळी क्लायमॅक्स येतो आणि आपण परत एकदा सावरुन बसतो. (क्लायमॅक्स पण १५ च्या ऐवजी १० च मि. चा हवा होता, काय घडणार आहे हे कळल्यानंतर प्रसंग लगेच संपला असता तरी चालू शकत होतं.) पण या एक दोन बाबींखेरीज चित्रपट म्हणजे खरी मेजवानी आहे.
गिरीश आणि उमेश कुलकर्णींचा सिनेमा, त्यातही नाना, दिलीप प्रभावळकर, सो कुल, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम असले तगडे कलाकार असल्यामुळे व्यक्तिरेखांची मांडणी, संवाद, अभिनय या गोष्टींविषयी वेगळ्याने बोलायची गरज नाही. त्या उत्तम आहेत असा अंदाज बांधला होताच. तो खरा निघाला याचा आनंद आहे. तिन्ही गाणी उत्तम झालियेत. "देवा तुला शोधू कुठं" आणि "दत्त दत्त" गाण्यांचा वापर खूपच प्रभावी. गोष्टी माहित असतात तरीही त्या पुन्हा मांडलेल्या पहाताना विषण्णता दाटून येते, ती येणं खूप महत्वाचं असतं कारण त्यातच सिनेमाचं यश आहे. (प्रयोग फसला तर "त्यात काय नवीन, हे माहितीच होतं" असाही विचार येऊ शकतो. तो येत नाही.) उत्तम लँडस्केपस हा नेहमीप्रमाणेच अजून एक प्लस पॉइंट. पण आधीच्या चित्रपटांत विशेषकरुन न वापरलेली रात्रीची काही दृश्य लई म्हणजे लई भारी वाटली. माळरानावरच्या तार्‍यांनी भरलेल्या रात्री खूपच नेत्रसुखद होत्या. नसीरुद्दीन चा वावर अतिशय नेमका. टायटल पडतानाचं सँड अ‍ॅनिमेशनदेखिल मस्त.
एकूणच हा सिनेमा म्हणजे "कंप्लीट पॅकेज" आहे. देव करो आणि हा सिनेमा तुमच्याकडून मिस न होवो.. स्मित
 
Copyright 2009 CineMania.... All rights reserved.
Free WordPress Themes Presented by EZwpthemes.
Bloggerized by Miss Dothy